Friday, June 4, 2010

आत्मपरिक्षण

" वडिलांची आज्ञा घेतल्यावाचून कोठे घरातून जाऊ नये"
हे वाक्य रोज म्हणजे अगदी दररोज शाळेत प्रार्थनेच्या वेळेला म्हटलं जायचं. तेही अगदी सहज. तेव्हा वाटायचं अरे ही काय वेगळी लक्षात ठेवायची गोष्ट आहे का? बाबांना विचारल्याशिवाय कसं काय घराबाहेर जाणार rather ते तेव्हा अशक्यच वाटायचं आणि जेव्हा अचानक मागे वळून पाहताना जाणवलं की खूप मागे पडले ते दिवस तेव्हा उगाचच मन हुरहुरलं.
आताशा वाटेल तेव्हा पायात चपला अड़कवून मन मानेल तिथे भटकायची सवय जड़लीये. रात्री १२ काय आणि १ काय वेळेला धरबंध म्हणून काही राहिलेलाच नाही. घरातही एव्हाना सगळ्याना याची सवय झालेली असावी. कधी काळी आईला सांगितल्याशिवाय घराबाहेर पाउल ठेवायची माझी बिशाद नव्हती आणि आता तीच मी तिला बाहेर जाताना "मी येते गं " फ़क्त एवढच दारातून ओरडून निरोप घेते.
बाबा घरी असतील तर तेवढं करण्याचीही तसदी मी घेत नाही. आता माझ्या या वागण्याचं समर्थन करण्याचं माझं प्रयोजन नाही पण सहज म्हणून याचं विश्लेषण करावं एवढाच यामागचा माझा हेतू आहे. तर हे असं का? एकतर मला घरातून एवढी जास्त सूट दिली गेली असावी की ती सहज हाताळणं मला जमलं नसावं किंवा माझ्यावर दाखवल्या गेलेल्या विश्वासाचा मी गैरफायदा घेत असेन. कदाचित असही असू शकेल की मी इतकी बेफिकीरपणे वागत असेन की माझ्या भोवताली माझी काळजी करणारी माणसं आहेत या गोष्टीचा विचार करण्या इतपत माझी बुद्धि चालत नसेल. या सगळ्या शक्यता पड़ताळून मी अद्यापही कोणत्या निष्कर्षाप्रत पोहोचलेले नाही.