Saturday, September 12, 2009

जाणीव

आज फ़क्त तुझ्यावर लिहायचं म्हणून Keyboard वरून हलकेच बोटं फिरवली तेव्हा तूच जवळ असल्याचा भास झाला.... आणि telepathy का काय म्हणतात ते माहित नाही मोबाइल वर नेमका तुझाच फ़ोन .. गेल्या कित्येक दिवसांत तुझी काही खबर नसताना अचानक आलेला.. मी काही क्षण खुर्चीत तशीच थिजलेली..भानावर येत फ़ोन उचलला आणि तुझा आवाज ऐकला मात्र नि थेट भूतकाळात शिरले... कसं कोण जाणे सगळ कसं अगदी काल घडल्यासारखं स्वच्छ डोळ्यांसमोर आलं ..

तुझी माझी ओळख अगदी औपचारिकपणे पार पडलेली ...पहाताक्षणी मला भावलेले तुझे निष्पाप डोळे , चेहरया वरचं तुझं निरागस हसू ..नंतर ते सगळ कसं आणि केव्हा विरलं ते आता सांगता येत नाही ..
तुला आठवतं तो कॉलेजचा पहिलाच दिवस होता अर्थात ' माझा पहिला दिवस ' , तुम्ही सगळे केव्हाच जुने होउन गेला होतात .. माझी शेवटची बसही चुकलेली .. कसा कोण जाणे तू अचानक उगवलास .. अगदी अहो जाहो करून बोलायला लागलास आणि माझ्याही नकळत मला हसू फुटलं. तू वेड्यासारखं बघतच राहिलास मग मीच ओशाळले. तेव्हा लगेच अगदी प्रौढाचा आव आणत तू मला माझ्या त्या अनोळखी ठिकाणी ' एकटी ' असल्याची जाणीव करून दिलीस आणि वर माझी जबाबदारी घेतल्याचा आव आणत मला सोबत करण्याची तयारीही ...तुझं हेच वागणं मला कधी उमगलचं नाही रे . तू नेहमी दोन विरुद्ध टोकांना असणारया गोष्टी एकाच वेळी कशा करतोस तुझं तूच जाणो..

नंतर मला स्वच्छ आठवते ती सकाळ आम्ही सगळे कैंटीन मध्ये गप्पा करत चहा घेताना ...तू मात्र कैंटीनच्या बाहेर शुन्यात नजर लावलेला .. खरचं कसला विचार करत होतास एवढा तेव्हा ? विचारायचं राहुनच गेलं ...मी तुला तसं पाहिलं आणि चटकन काय बोलून गेले आठवतच नाही पण आमच्या टेबल वरच्या कुणीतरी तुला मी बोलावल्याचं सांगितलं आणि तू आलास .. अगदी सहज आलास ..का आलास??
जर नसताच आलास तर पुढचं बरच अघटित टळलं असतं.. हे सगळ कधी घडलच नसतं ..
तू नेहमीच मला लहान मुलासारखं treat केलंस आणि हा माझाच मुर्खपणा म्हणुन मी ही ते चालवून घेतलं .. कधी मोठं व्हायचा प्रयत्नही नाही केला रे तुझ्यापुढे.. अगदी एकदा दोनदा ओठांवर आलेले शब्दही निकराने मागे परतवून लावले ..भीती होती तुला मुकण्याची पण कुणास ठावुक म्हणुनच तू माझ्यापासून दुरावला असशील..
जेव्हा असा तू खुप खुप दूर निघून गेलास ना, तेव्हा खुप हताश झाले होते रे मी ,म्हणजे अगदी वेड लागायची पाळी आली होती .. रस्त्यातून चालताना गर्दीत अचानक तुझाच चेहरा दिसे आणि भारावल्यागत मी त्या व्यक्ति मागे चालू लागत असे , भानावर येई तेव्हा कोणत्यातरी भलत्याच रस्त्यावरून चालत असायचे .. असं कितीदा घडलंय तेही नाही आठवतं. अशावेळी इतरांचा एवढा आधार वाटतो म्हणुन सांगू .. किती नाना प्रकारे लोकं तेव्हा माझी समजूत काढत हे आठवलं ना तरी आता त्याचं हसू येतं पण तेही केविलवाणं ..

मग विचार केला काय हा वेडेपणा , कशासाठी हा अट्टाहास ? कितीक प्रश्न डोक्यांत घेउन मी स्वतः लाच भंडावून सोडलं .. मनाच्या वेदना शमवायला शरीराला देता येतील तेवढ्या यातना दिल्या पण खरं सांगू मनू वेळेनेच या सगळ्यावर मात केली रे .. जसजसा काळ पुढे सरकला तसतशा या बोचरया जाणिवा बोथट झाल्या जरी नेणिवेत त्या तितक्याच धारदार असल्या तरी .. कसा कोण जाणे मनावर ताबा मिळवण्यात मी काही अंशी तरी यशस्वी झाले .. तुझं वेगळ आणि माझं एक सर्वस्वी वेगळ विश्व आहे , असू शकतं यावर मीच माझ्यापुरतं शिक्कामोर्तब केलं आणि माझी नवी वाट शोधायला सुरुवात केली तेव्हा जाणवलं की मला माझ्याच सोबतीची खूप गरज आहे ते ...

2 comments:

  1. गौरी देशपांडे चा effect आहे हा.......
    अजुन कही नाही .....
    but i cn understnd.....
    नक्की काय चालू असेल तुझ्या मनात......
    त्या झल-छावनी ला मी बघून घेइल

    ReplyDelete